आयपीएल फायनलवरून ममता बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींवर थेट निशाणा

0
182

माणदेश एक्सप्रेस न्यूज|कोलकाता : आयपीएल २०२५ चा अंतिम सामना अचानकपणे कोलकाता येथून हलवून अहमदाबादला हलवल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “मी तोंड उघडलं तर तुम्ही बाहेर कमावलेली प्रतिष्ठा जाईल,” असे परखड शब्दात त्यांनी म्हटले आहे.

 

आधी नियोजित असलेला अंतिम सामना २५ मे रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार होता. मात्र, पावसाच्या शक्यतेचा हवामान खात्याचा अंदाज देत बीसीसीआयने सामन्याचे वेळापत्रक व स्थळ बदलले. अंतिम सामना आता ३ जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या निर्णयावरूनच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या निर्णयावर टीका करताना म्हटले, “मी माझ्या नावाने स्टेडियम किंवा रेल्वे लाईन बांधत नाही. प्रसिद्धीची गरज नाही. आदर्श माणूस म्हणून जगणे मला महत्त्वाचे वाटते. पण इथे काय सुरू आहे? सर्व महत्त्वाचे सामने गुजरातमध्येच का? बंगाल, केरळ, कर्नाटकमध्ये काय दोष आहे?”

 

बीसीसीआयने प्लेऑफ सामन्यांच्या स्थळांतही बदल केले आहेत. क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटर सामने हैदराबादऐवजी मोहालीला हलवण्यात आले, आणि आता अंतिम व क्वालिफायर-२ सामन्यांचे आयोजनही नरेंद्र मोदी स्टेडियमवरच केले जात आहे. यावरून ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वारंवार महत्त्वाच्या सामन्यांचे आयोजन का केले जाते, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

 

सध्या RCB संघ अंतिम फेरीत पोहोचलेला असून, एलिमिनेटर आणि क्वालिफायर-२ नंतर अंतिम सामन्याचा दुसरा संघ निश्चित होणार आहे. पण यापेक्षा चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे आयपीएलमधील ‘राजकीय खेळी’वर मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी उपस्थित केलेले प्रश्न.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here