
शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र मंजूर केल्याबद्दल पडळकरांचा नागरी सत्कार
माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा : जयंतरावांचं अजून पण तळ्यात मळ्यात आहे. त्यांना कुठे जायचं आहे, हे नक्की नाही. त्यांना गट नाय, पक्ष नाय, विचार नाही, परंतु पण मी आणि सदाभाऊ त्यांना ताकदीने विरोध करणारच, अशा शब्दांत आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.
विटा येथील पंचफुला मंगल कार्यालय येथे शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खानापुर येथे मंजूर केल्याबद्दल आमदार पडळकर यांचा खानापूर तालुका भाजपच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मंचावर माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर, डॉ. रविंद्र आरळी, पंकज दबडे, प्रमोद भारते, जयवंत सरगर, विनायककाका पाटील, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका ताकदीने लढवायच्या आहेत. आपल्याकडे लढणारे आणि विरोधकांना लोळवणारे उमेदवार आहेत. अशा उमेदवारांच्या पाठीशी आपण ताकदीने उभारणार आहोत. गेल्या दोन विधानसभा निवडणूकीत मला इथून लढता आले नाही. मात्र तरीही तुम्हाला निधी कमी पडणार नाही, फडणवीस मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे खानापूर मतदारसंघासाठी वेगळा निधी आपण मंजूर करून आणू. खानापूर तालुक्यात आणि जिल्ह्यात आपण ताकदीने पक्ष बांधणी करू. जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी कामाला लागा, असे आवाहनही आ. पडळकर यांनी केले.
माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, गोपीचंद पडळकर हे जनतेतून आमदार होऊ शकतात, हे जतच्या जनतेने दाखवून दिले. मंत्रीपद हा नशिबाचा खेळ आहे. दोस्ती कशी करावी आणि टिकवावी हे आमदार पडळकर यांच्याकडून शिकावे. जे रोखठोक बोलतात त्यांच्या मनात काही असत नाही. असेही खोत म्हणाले.
माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर म्हणाले, या तालुक्यात कुठल्यातरी पोलिसाने यावे अन कार्यकर्त्यावर केस करावी हे आता होणार नाही. या अगोदर मतदार संघात अनेक आमदार होवून गेले. परंतु चिखलहोळ गावाचा प्रश्न देखील सोडवता आला नसल्याची टीका त्यांनी नाव न घेता, बाबर गटावर केली. येथून पुढे येणाऱ्या निवडणुका ताकदीने लढविणार असून, येथून पुढे श्रेयवादात न अडकता काम करत राहण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
प्रमोद भारते यांनी स्वागत आणि प्रास्ताविक, तर प्रथमेश सांळुंखे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. रविंद्र आरळी, निलेश पाटील, संदीप ठोंबरे, दाजी पवार यांचीही भाषणे झाली. यावेळी संतोष यादव, सचिन कदम, राहुल मंडले, माणिक शिंदे, सामराय तुंबगी, सुहास कुलकर्णी, करण जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.