
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरात काल गुरुवारी तापमानाने ४२.२८ अंशांचा उच्चांक गाठला. सूर्यनारायणाच्या प्रखर उष्णतेमुळे शहरवासीयांना ‘गर्मी’चा अनुभव आला आहे. नागरिकांना सकाळी आठ ते रात्रीपर्यंत कडक उन्हाच्या धगीचा मारा सहन करावा लागत आहे. सूर्यास्तानंतरही उष्णता कायम राहत असल्याने, शहरातील नागरिक हैराण झाले होते.
उन्हामुळे दुपारच्या वेळेत नागरिकांनी घराबाहेर पडणे कमी केले असून, रस्ते, बाजारपेठा ओस पडल्याचे चित्र आहे. शेतकरी, मजूर, वयोवृद्ध व लहान मुलांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.
आरोग्य विभागाने नागरिकांना उष्माघाताच्या धोक्याचा इशारा दिला आहे. पाणी भरपूर प्यावे, थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळावे, शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर न पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महसूल व हवामान खात्याने पुढील काही दिवस उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली आहे. तालुक्यात उष्णतेची लाट जाणवत असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
“दुपारी घराबाहेर पडणं अशक्य झाले आहे. उन्हामुळे डोळ्यांना झणझणीत जाणवतंय. पाण्याचा खूप वापर करावा लागतोय,” असे स्थानिक रहिवासी व चौंडेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन सपाटे यांनी सांगितले.