
माणदेश एक्सप्रेस
आळंदी : यंदा संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा आषाढी पायीवारीसाठी १९ जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी दिली. प्रथा – परंपरेनुसार १९ जूनला रात्री आठच्या सुमारास वाजत – गाजत माऊलींच्या पालखीचे समाधी मंदिरातून प्रस्थान होईल.
दर्शनबारी मंडपात (आजोळी) माउलींचा पहिला मुक्काम असणार आहे. २० जून व २१ जूनला पालखी सोहळा पुण्यनगरीत मुक्कामी राहील. दि. २२ व २३ जूनला सासवड, त्यानंतर २४ जूनला जेजुरी, २५ जूनला वाल्हे, त्यानंतर नीरा स्नाननंतर २६ जूनला पालखी सोहळा लोणंद येथे मुक्कामी जाईल. दोन दिवस पालखीचा मुक्काम होता. मात्र यंदा लोणंदला एकच दिवस पालखी मुक्कामी असेल. त्यांनतर २७ जूनला चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण सोहळा साजरा करून पालखी तरडगाव मुक्कामी जाईल. २८ जूनला फलटण, २९ जूनला बरड, ३० जूनला नातेपुते, १ जुलैला पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण घेऊन पालखी माळशिरसला मुक्कामी जाईल. २ जुलैला सकाळचा विसावा असलेल्या खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण सोहळा घेऊन पालखी वेळापूर मुक्कामी जाईल. ३ जुलैला भंडीशेगाव, ४ जुलैला वाखरी तर ५ जुलैला पालखी सोहळा पंढरीत पोहचणार असून मुख्य आषाढी एकादशी सोहळा संपन्न होईल.