
माणदेश एक्सप्रेस/पुणे : ठाकरे गटात सध्या गळती सत्र सुरू आहे. ऑपरेशन टायगर मध्ये अजून मोठा मासा गळाला लागला नसला तरी, स्थानिक स्वराज्य संस्थेपूर्वी अनेक दिग्गज पक्षाला जय महाराष्ट्र करत आहेत. पुणे आणि सिल्लोडमध्ये हेच चित्र दिसत आहे.
उद्धव सेनेला चोहोबाजूने खिंडार पाडण्याचे काम सुरू आहे. शिंदे गटाकडून तोडक काम सुरू आहे. कार्यकर्त्यापासून ते पदाधिकारी, नेत्यापर्यंत प्रत्येक जणाला गळ लावून शिंदे सेनेत आणण्याचे जोरकस प्रयत्न सुरू आहे. राजन साळवी गेल्यानंतर अजून बडेच बडे चेहरे शिंदे गोटात येतील, असा दावा करण्यात येत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव सेना खिळखिळी करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातच पुण्यात आणि सिल्लोडमध्ये उद्धव गटाला धक्का बसला आहे.
पुण्यात शहर उप प्रमुख राजेश पळसकर यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत 40 ते 50 कार्यकर्त्यांसोबत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. पुण्यात प्रस्तावित असणाऱ्या प्रवेशांसोबत हा प्रवेश सोहळा होईल. 22 वर्ष शिवसेनेत काम केल्यानंतर पळसकर यांनी अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांनी लिहिलेले पत्र सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
मागून आालेले अनेक जन पक्षाच्या माध्यमातून विविध संविधानिक पदावर गेले, तरीही कोणतीही तक्रार न करता पक्षासाठी झटत राहिलो. हे करताना पक्षाच्या आांदोलनाचे अनेक गंभीर गुन्हे देखील माझ्यावर दाखल होऊन अनेकदा तुरुंगावारी देखील झाली, असे पळसकर यांनी स्पष्ट केले.
आजपर्यंत पक्षावर आलेल्या संकटकाळात देखील निष्ठावंत म्हणून पक्षासोबत राहिलो. परंतू अलीकडच्या काळात राजकीय महत्वकांक्षा मनात ठेऊन काही जन पक्षाची पदे, उमेदवाऱ्या मिळून कार्यभाग साधून निघून जात आहेत अशा पक्षाशी निष्ठा नसलेल्यांना मोठ्या पदावर घेण्याचा नवीन पायंडा काही नेत्यांकडून पाडला जात आहे, सध्या संघटनेत “नव्यांना राम राम आणि निष्ठावंतांना थांब थांब” हि संकल्पना काही नेते राबवत आहे. ते मनाला पटले नसल्याने राजीनामा देत असल्याचे पत्र पळसकर यांनी ठाकरे यांना लिहिले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. सिल्लोडचे उमेदवार सुरेश बनकर भाजपमध्ये दाखल झाले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ते भाजपवासी झाले. बनकर यांनी ठाकरे गटाकडून अब्दुल सत्तार यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी सत्तारांना कडवी झुंज दिली होती. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर सुरेश बनकर यांनी भाजपाची वाट धरली आहे.