
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांना स्पष्ट संदेश दिला आहे – “हिंदी सक्तीवर चर्चा करत बसू नका, जनतेचे खरे प्रश्न अधिवेशनात मांडण्याची गरज आहे.”
राज ठाकरे म्हणाले की, “राज्यातील सरकारने हिंदी सक्तीचं परिपत्रक मागे घेतलं आहे. त्यामुळे आता या विषयावर अधिक वाद घालण्यात काही अर्थ नाही. महाराष्ट्रात अनेक गंभीर समस्या आहेत – शिक्षण, शाळा, शिक्षक, पगार, बेरोजगारी यावर चर्चा झाली पाहिजे. अधिवेशनाचा वापर मुद्देसूद चर्चा करण्यासाठी करावा.”
राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं की, “हिंदी सक्ती कुठल्याही स्वरूपात मान्य नाही. हिंदी ही फक्त एका प्रांताची भाषा आहे. पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी शिकवणं योग्य नाही. कोणतीही समिती आली तरी ती स्वीकारली जाणार नाही.” त्यांनी नरेंद्र जाधव यांच्या समितीच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत सांगितलं की, “महाराष्ट्रात याला किती मोठा विरोध झाला हे त्यांना समजायला हवं.” राज ठाकरे यांनी ‘हिंदी सक्ती’च्या परिपत्रक मागे घेण्यात आल्यानंतर ५ जुलै रोजी विजयी मेळाव्याचे आयोजन करण्याची घोषणा केली.
या मेळाव्याबाबत ते म्हणाले, “हा कोणत्याही पक्षाचा मेळावा नसेल. कोणताही झेंडा नसेल, फक्त मराठी अस्मिता हाच अजेंडा असेल.” त्यांनी स्पष्ट केलं की, “हा कोणत्याही युती किंवा आघाडीशी संबंधित नसून, मराठीसाठी लढणाऱ्या प्रत्येकाचा मेळावा असेल.”
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील त्रिभाषा धोरणाच्या संदर्भात बोलताना स्पष्ट केलं की, “माझा विरोध कोणत्याही पक्षाशी नाही, तर जो मराठी माणसाच्या विरोधात जाईल, त्याच्याशी आहे. मराठी भाषेवर कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही.”
आपल्या भाषणाच्या शेवटी राज ठाकरे यांनी स्पष्ट इशारा दिला की, “महाराष्ट्राच्या सर्व बाजूंनी लचके तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठी व्यक्तीने यासाठी जागृत व्हायला हवं. भाषेवरून राजकारण न करता, भाषेसाठी लढा द्या.”