
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असून, सुरुवातीलाच सरकारवर विरोधकांचा दबाव वाढण्याची शक्यता आहे. ‘माझी लाडकी बहीण’ योजनेपासून ते शेतकरी कर्जमाफी, महागाई, महामार्ग प्रकल्प, रोजगार, शैक्षणिक गोंधळ, आत्महत्या आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांवर विरोधकांनी सरकारला अडचणीत आणण्याची तयारी केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनुसार ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झालेली नाही. शिवाय, या योजनेसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याच्या निधीचा वापर केल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. यावरून सरकारवर विश्वासघात केल्याचा ठपका ठेवण्यात येणार आहे.
महायुतीने निवडणूकपूर्व जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे वचन दिले होते. मात्र अद्यापही कर्जमाफीसंदर्भात ठोस निर्णय झालेला नाही. यामुळे शेतकरी प्रश्नावर सरकारची अडचण वाढू शकते. विरोधी पक्ष या मुद्यावरून सरकारला चोहोबाजूंनी घेरण्याची शक्यता आहे.
८०२ किमी लांबीच्या नागपूर–गोवा ‘शक्तीपीठ’ द्रुतगती महामार्गाला मंजुरी देण्यात आली असली तरी, कोल्हापूर जिल्ह्यातून हा महामार्ग नेण्याला स्थानिक लोकप्रतिनिधी, मंत्री आणि शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. विरोधाच्या पार्श्वभूमीवरही सरकारने निर्णय कायम ठेवला आहे, ज्यामुळे सत्ताधारी पक्षातीलच काही आमदार सरकारविरोधात भूमिका घेण्याची शक्यता आहे.
आणखी कोणते मुद्दे घेरणार सरकारला?
पावसाळी अधिवेशनात सरकारसमोर पुढील प्रश्न गंभीर ठरणार आहेत:
• पुण्यातील हुंडाबळी प्रकरणातील वैष्णवी हगवणे आत्महत्या
• मे-जून पावसामुळे मुंबई, पुण्यातील जनजीवन विस्कळीत
• इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेला अपघात आणि मृत्यू
• इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील अडथळे
• मंत्री संदिपान भूमरे यांच्या चालकाच्या नावे आढळलेली संपत्ती
अंदाज समितीचा वादग्रस्त दौरा
विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या धुळे दौऱ्यात शासकीय विश्रामगृहात कोट्यवधींची रोकड सापडल्याचा प्रकार चर्चेत आहे. ही समिती शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू असली तरी त्यातून विधिमंडळ समित्यांबाबत संशय निर्माण झाला आहे.