
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : राज्य सरकारच्या ‘शक्तिपीठ महामार्ग’ प्रकल्पावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्पष्टपणे भूमिका मांडत विरोधकांवर निशाणा साधला. “कुरघोडी कसली? वित्त विभागाचे आक्षेप मांडणे ही त्यांची जबाबदारीच आहे,” असे त्यांनी ठणकावले.
फडणवीस म्हणाले, “आज जे शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत आहेत, त्यांनी यापूर्वी समृद्धी महामार्गालाही विरोध केला होता. पण तोच मार्ग आज गेमचेंजर ठरला आहे. मराठवाडा आणि इतर दुष्काळग्रस्त भागांचे चित्र बदलायचे असेल, तर हा महामार्ग अत्यंत आवश्यक आहे.”
ते पुढे म्हणाले, “या मार्गावर प्रत्येक १०० किमी अंतरावर ५०० ते १,००० शेततळी, नाल्यांवर बंधारे, जलसंवर्धन, जलपुनर्भरण आणि हरित ऊर्जा निर्मिती यामुळे केवळ रस्त्याचा नाही, तर एकात्मिक विकासाचा मार्ग खुला होईल.”
वित्त विभागाकडून आलेल्या आक्षेपांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी केली असल्याच्या चर्चा सुरू असताना, फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, “कोणताही प्रकल्प आला की त्याचा वित्तीय भार, कर्ज, आणि परताव्याचा अंदाज मांडणे ही वित्त विभागाची जबाबदारी असते. त्यामुळे त्याला कुरघोडी म्हणणे चुकीचे आहे.”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी या प्रकल्पावर साशंकता व्यक्त करत सांगितले की, “प्रकल्प काय आहे ते समजून घेईन. गरज आहे का हे पाहीन. विरोधासाठी विरोध नको. शेतकऱ्यांच्या भावना आणि राजू शेट्टी यांचा आग्रह समजून घेतल्यानंतरच स्पष्ट भूमिका मांडेन.”
तर कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, “हा प्रकल्प राज्य सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. कोल्हापुरातून कसा नेता येईल यासाठी चार पर्याय सुचवले आहेत. शेतकऱ्यांना विश्वासात घेत चर्चा केली जाईल. जिथे विरोध असेल तिथे मार्गरेषा बदलण्याचा विचार केला जाईल.”