ठाकरे बंधू एकत्र! हिंदी सक्तीविरोधात मुंबईत संयुक्त मोर्चा

0
65

माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई – राज्य सरकारच्या नवीन शिक्षण धोरणांतर्गत शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे – हे दोघंही आता एका व्यासपीठावर येणार आहेत. हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मुंबईत एकत्र मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे.

 

शिवसेना (ठाकरे गट) प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी ट्विटरवरून ही माहिती दिली. त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो पोस्ट करत लिहिलं – “महाराष्ट्रातील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र!” या ट्विटनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

 

यापूर्वी राज ठाकरे यांनी ५ जुलै रोजी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली होती, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ७ जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, मराठीच्या मुद्द्यावर दोन वेगवेगळे मोर्चे कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होताच आता दोघंही नेते एकत्रित मोर्चा काढण्यास सहमत झाले आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही याला दुजोरा दिला असून, “५ जुलै रोजी हा ऐतिहासिक मोर्चा निघणार असून, हा मोर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा ठरेल,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

 

गेल्या काही काळापासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अनेकदा दोघांनीही अशा संकेतांना बळ दिलं होतं. आता मराठीच्या प्रश्नावर ते एकत्र येत असल्यामुळे, या मोर्चातून केवळ भाषेचा नाही तर राज्याच्या राजकारणाचाही नवा अध्याय सुरू होणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

 

राज्य सरकारने नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी भाषेला बंधनकारक केल्याने अनेक मराठी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञांनी याला जोरदार विरोध दर्शवला आहे. “मराठी राज्यात मराठीच प्राधान्याला हवा,” अशी मागणी वाढत आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here