आज तुम्ही पंतप्रधानांना शिव्या देऊ शकता – मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला, आणीबाणीवर दिल्या आठवणी

0
52

माणदेश एक्स्प्रेस न्यूज|मुंबई : “आज कुणीही रस्त्यावर उभं राहून देशाच्या पंतप्रधानांना शिव्या घालू शकतो आणि त्यावर कुठलीही कारवाई होत नाही. हीच खरी लोकशाही आहे”, असं स्पष्ट वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आणीबाणी लागू होऊन ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईत आयोजित ‘संविधान हत्या दिन’ कार्यक्रमात ते बोलत होते.

 

यावेळी त्यांनी आणीबाणीच्या काळातील दडपशाहीचा खरपूस समाचार घेतला. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधानच त्या काळात संपवण्यात आलं. विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आलं, विवाह न झालेल्या तरुणांचं जबरदस्तीने कुटुंब नियोजन करण्यात आलं, अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली. वृत्तपत्रांवर बंदी घालण्यात आली. संपूर्ण देशात अनुशासनाच्या नावाखाली उन्माद सुरू होता,” अशी आठवण फडणवीसांनी करून दिली.

 

फडणवीसांनी माजी मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचा उल्लेख करत सांगितले की, “फर्नांडिस भूमिगत झाल्यानंतर त्यांचा भाऊ आणि आई यांच्यावर अमानुष छळ झाला. त्याचा परिणाम त्यांच्या भावाच्या मानसिक आरोग्यावर झाला.” “लोकशाहीच्या रक्षणासाठी जे लोकतंत्र सेनानी लढले, त्यांचा आम्ही सन्मान करत आहोत. त्यामुळेच २०१७ मध्ये त्यांच्या सन्मानार्थ मानधन देण्याचा निर्णय घेतला,” असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

 

कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. लोकशाहीचे मूल्य जपण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सेनानींच्या स्मृतींना या कार्यक्रमातून उजाळा देण्यात आला.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here