अलमट्टी धरण ५२ टक्के भरले; नियमांचे उल्लंघन, “या” जिल्ह्यांत चिंता

0
182

माणदेश एक्सप्रेस न्यूज|सांगली – केंद्रीय जलआयोगाच्या स्पष्ट नियमांना डावलत कर्नाटक सरकारच्या जलसंपदा विभागाने अलमट्टी धरणात ५२ टक्के पाणीसाठा करून मोठे धोके पत्करले आहेत. आयोगाने जूनअखेरपर्यंत केवळ ४७ टक्के पाणीसाठ्याची मर्यादा घालून दिली असताना १५ जून रोजीच धरणात ६४.०३ टीएमसी (५२%) पाणीसाठा झाला आहे. या निर्णयामुळे सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांतील कृष्णा, पंचगंगा व वारणा नदीकाठच्या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

कर्नाटकातील अलमट्टी धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता १२३ टीएमसी (५१९.६ मीटर) इतकी आहे. केंद्रीय जलआयोगाने ठरवून दिल्यानुसार जून महिन्यात फक्त ५७ टीएमसी (५१३.६० मीटर) म्हणजे ४७ टक्क्यांपर्यंतच साठा ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, धरणात सध्या २३,२३० क्युसेक पाण्याची आवक असून, केवळ १०,००० क्युसेक विसर्ग सुरू आहे. मान्सून लवकरच सक्रिय होण्याची शक्यता असून, पुढील पावसाळ्यात या अतिरिक्त पाण्याचे व्यवस्थापन कसे केले जाईल, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

 

या पार्श्वभूमीवर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील प्रशासन सतर्क झाले असून, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटकच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याची माहिती अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी दिली. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, “कर्नाटक प्रशासन पाण्याचा विसर्ग वाढवेल.”

 

दरम्यान, कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी कर्नाटक सरकारवर टीका करत म्हटले, “धरणाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करून पाणीसाठा वाढवण्यात आला आहे. यावर राज्य सरकारने तत्काळ कारवाई करत कर्नाटकला नोटीस बजावली पाहिजे. यासोबतच आम्ही केंद्रीय जलआयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल करणार आहोत.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here