अहमदाबाद विमान अपघातावर संजय राऊत यांची गंभीर शंका; तपासाची मागणी

0
177

माणदेश एक्स्प्रेस न्यूज|अहमदाबाद : अहमदाबाद विमान अपघातानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली असताना शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी या दुर्घटनेवर गंभीर शंका व्यक्त करत केंद्र सरकारवर सवालांची सरबत्ती केली आहे. एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलायनर एआय-१७१ विमानाचा भीषण अपघात होऊन २७४ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अहमदाबादहून लंडनला जाताना उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच हे विमान कोसळले.

 

संजय राऊत यांनी याप्रकरणी अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. “मुळात अपघात झाला कसा? एकाचवेळी दोन इंजिन बंद पडली कशी? सायबर हल्ल्याच्या माध्यमातून विमान हायजॅक करण्यात आले का? याची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

 

राऊत म्हणाले, “ड्रीमलायनर खरेदीच्या वेळी भाजपाने या विमानाच्या क्षमतेवर आणि इंजिनावर शंका उपस्थित केल्या होत्या. आजच्या अपघातामुळे त्या शंकांची गंभीरता दिसून येते आहे. ३० सेकंदात दोन इंजिन बंद होणे ही सामान्य बाब नाही. सायबर हल्ल्याचा भाग असू शकतो का, याचा सखोल तपास झाला पाहिजे.”

 

ते पुढे म्हणाले, “अहमदाबाद विमानतळावरील मेंटेनन्स संस्थांमध्ये आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये (एटीसी) माणसांची कमतरता का आहे? जिथे विमान सुरक्षा सर्वाधिक महत्त्वाची आहे तिथेच ५६ टक्के माणसे कमी का आहेत? अहमदाबाद विमानतळ कोणाच्या ताब्यात आहे, आणि त्या ठिकाणी सुरक्षा पद्धती कशा आहेत याचाही तपास व्हावा.”

 

राऊतांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. “मंत्र्यांनी मृतांचे ढिगारे पादाक्रांत करत फोटोसेशन केले, पण त्यांच्या चेहऱ्यावर शोकाची लक्षणे नव्हती. महाराष्ट्रातील २० जणांसह मृत ३०० हून अधिक प्रवाशांच्या कुटुंबीयांच्या वेदना सरकारला दिसत नाहीत का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

 

अपघाताची चौकशी देश-विदेशातील एजन्सीद्वारे होत असून, नागरिकांच्या मनातील शंका दूर करणं गरजेचं असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. “जर या अपघाताविषयी नागरिकांच्या मनातील संशय कायम राहिला, तर विमान प्रवासावर त्याचा विपरीत परिणाम होईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here