बच्चू कडूंचं आंदोलन उफाळलं; अन्नत्यागाचा चौथा दिवस, सरकारला दिला इशारा

0
132

माणदेश एक्सप्रेस न्यूज|अकोला — शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन चांगलंच तीव्र झालं आहे. आज आंदोलनाचा चौथा दिवस असून, अद्याप शासनाकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने कडू यांनी थेट इशारा दिला — “जास्त त्रास दिलात, तर मुंबई गाठू.”

 

अकोल्यामध्ये सुरु असलेल्या आंदोलनात बच्चू कडू यांनी शासनाच्या उदासीनतेवर जोरदार टीका केली. “पालकमंत्री अकोल्यात येऊन गेले, पण भेटायला आले नाहीत. जिल्हाधिकारी फोन लावतो, पण मंत्री बोलायला तयार नाहीत. मुख्यमंत्री अकोल्यातच आहेत, तरी दुर्लक्ष होतंय. हे कुठल्या मानसिकतेचं राज्य आहे?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत. मंत्रालयाबाहेर त्यांनी निदर्शने सुरू केली असून, शासनाला तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे. कडू यांनी राम ठाकरे नावाच्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा उल्लेख करत राज्य सरकारवर निशाणा साधला. “कालच एक शेतकरी मेला, तरीही त्याच छाताडावर कार्यक्रम घेण्याची तयारी राज्यकर्ते दाखवतायत,” असे म्हणत त्यांनी सरकारच्या संवेदनशून्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

 

राज्य सरकारकडून अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन आलं नसून, बच्चू कडूंच्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here