
माणदेश एक्सप्रेस न्युज|कराड – “गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो, त्यात गैर काय? मूर्खांच्या वक्तव्याला अर्थ नसतो,” अशा शब्दांत शिवसेना नेते व सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊत यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
कराड येथे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिरसाट यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. “आम्ही रेड्याचा बळी दिला, असं कोणी म्हणत असेल, तर सांगतो – रेड्याची शिंगं आम्ही जपून ठेवली आहेत. वेळ आली की ती कोणाच्या पोटात घुसवायची ते पाहू,” असे त्यांनी ठामपणे म्हटले.
यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करताना त्यांनी सांगितले की, “ते महाराष्ट्रासाठी प्रेरणास्थान आहेत. आयुष्यात झालेल्या चुका आणि भविष्यातील चांगल्या वाटचालीसाठी त्यांच्या आशीर्वादासाठी आलो आहे.” दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी घोडबंदर ते भाईंदर उन्नत मार्गातील कथित घोटाळ्याबाबत लावलेल्या आरोपांवर उत्तर देताना शिरसाट म्हणाले, “आम्ही कामातून उत्तर देतो. आरोप करणाऱ्यांनी २५ वर्षांत मुंबईची वाट लावली आहे. निविदा आणि टक्केवारीच्या पलिकडे हे लोक जात नाहीत.”
राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या ‘हिंदी मुंबईची बोलीभाषा बनली’ या वक्तव्यावर बोलताना शिरसाट म्हणाले, “मराठी आमची अभिमानाची भाषा आहे. मुंबई ही मराठी माणसांचीच आहे. परप्रांतीय असो किंवा कोणीही – त्यांना मराठी बोलावीच लागेल.”