
माणदेश एक्सप्रेस न्युज/मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भातील वक्तव्यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नागपूरमध्ये बोलताना अमित शाह यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. “आज बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी ऑपरेशन सिंदूरसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली असती,” असे विधान शाह यांनी केले होते. यावर संजय राऊतांनी आज संतप्त प्रतिक्रिया देत अमित शाह यांना खरपूस उत्तर दिले.
पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, “26 माई रोजी पहलगाममध्ये 26 महिलांच्या कपाळावरचं कुंकू फुसलं, त्याला जबाबदार कोण? गृहमंत्री म्हणून अमित शाह यांनी याचा राजीनामा दिला पाहिजे. हे सरकार अपयशाचं आणि बिनडोकपणाचं उत्तम उदाहरण आहे,” अशी तीव्र टीका त्यांनी केली.
शाह यांच्या बाळासाहेबांविषयीच्या विधानावर उत्तर देताना राऊत म्हणाले, “तुम्ही म्हणता बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी मिठी मारली असती? खरं तर बाळासाहेब असते, तर त्यांनी अशा बेईमानीच्या राजकारणाला चपराक दिली असती. तुमच्या स्वार्थासाठी शिवसेना फोडली, हे बाळासाहेबांचा अपमानच आहे,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सुनावले.
राऊतांनी पुढे असा दावा केला की, “शिवसेनाप्रमुख असते, तर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना आज पश्चाताप झाला असता. मी कुणाला खुनातून वाचवलं, कुणाला मुख्यमंत्रीपद मिळवून दिलं, हे लक्षात घ्या.” राऊतांनी सरकारवर हल्ला चढवत स्पष्ट शब्दांत इशारा दिला – “थोडी तरी नैतिकता शिल्लक असेल तर अमित शाह यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. आणि महाराष्ट्राच्या वाट्याला लागू नका!”