मंत्रिपदाबाबत छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

0
232

माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई – महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त करणारे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ अखेर मंत्रिपदावर विराजमान झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. “मागच्या मंगळवारीच शपथ घेण्याचं ठरलं होतं, पण मी कोणालाही काही सांगितलं नाही,” असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

 

ते पुढे म्हणाले, “मला काल विचारलं गेलं की तुम्ही म्हणाला होता, ‘जहा नहीं चैन वहां नहीं रहना’, मग मी म्हणालो ‘देर आये दुरुस्त आये’. काही लोक थोडावेळ या घरात, थोडावेळ त्या घरात असतात. अशा लोकांना ही वेदना समजणार नाही.”

 

भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचा उल्लेख करत सांगितलं की, “त्यांनीच याबाबत लक्ष घातलं आणि दुरुस्ती केली. माझ्या पेक्षा तुम्हा सगळ्यांना जास्त आनंद झाला असेल. हे राजकारण म्हणजे सापशिडीचा खेळ आहे, वर गेलं की कधी खाली येतो, हे सतत चालूच असतं.”

 

यावेळी भुजबळांनी आगामी निवडणुकांविषयीही भाष्य केलं. “आता सर्वांना बरोबर घेऊन महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका लढवायच्या आहेत. अजितदादांनी सुद्धा सांगितलं आहे की सगळ्यांना सोबत घेऊनच पुढे जायचं आहे. प्रत्येकाला संधी द्यावी लागेल. तो पडला तरी चालेल, पण तो आपला घटक आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांमध्ये राहून काम केलं पाहिजे,” असंही ते म्हणाले.

 

या वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अंतर्गत गटबाजी, मंत्रिपद वाटप आणि आगामी रणनीती यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. भुजबळांचा खुलासा आणि त्यांची स्पष्टवक्तेपणाची शैली पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here