
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | मुंबई
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची तयारी जोमात सुरू असून, शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत सेना भवन येथे झालेल्या बैठकीत भाजपवर जोरदार टीका केली. “भाजपचे ओव्हरलोड झालेले जहाज बुडणार आहे,” असा स्फोटक दावा करत त्यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
“काश्मीर हे कालही आपलं होतं, आजही आहे आणि उद्याही राहील,” असे ठाम विधान करत ठाकरे यांनी देशाच्या सुरक्षेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. “आपले सरकारवर वैचारिक मतभेद असू शकतात, पण देशावर संकट आलं, तर आम्ही पंतप्रधानांच्या सोबत उभे राहू,” असे त्यांनी नमूद केले.
ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना म्हटले की, “अमित शहा हे आता तीन पक्षांचे प्रमुख बनले आहेत – भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट. सत्ता ही येते-जाते, पण त्यात अति हुरळून जाऊ नये, अथवा गेल्यावर खचूनही जाऊ नये. पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत.”
या बैठकीत त्यांनी पक्षातील नेत्यांना महाराष्ट्रभर दौऱ्याचे आदेश दिले असून, प्रत्येक नेत्याला विशिष्ट जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील जनतेच्या भावना समजून घेऊन अहवाल सेना भवनमध्ये सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.
“वन नेशन, वन इलेक्शन” या प्रस्तावावर भाष्य करताना, ठाकरे म्हणाले की, “हे धोरण लागू करायचे असेल तर निवडणुका पारदर्शक हव्यात. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री प्रचारात उतरू नयेत, हेही स्पष्ट ठरवले पाहिजे.”