
माणदेश एक्स्प्रेस/मुंबई : सुमारे दीड, पावणे दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट अस्तित्वात आले होते. या दोन्ही गटांमध्ये एकमेकांविरोधात कुरघोडीचं राजकारण होत असलं तरी दोन्हीकडच्या नेत्यांनी एकमेकांविरोधात बेछूट आरोप मात्र केलेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीचे हे दोन्ही गट एकत्र येऊ शकतात, असे दावे वारंवार करण्यात येत असतात. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांमध्येही तशी जवळीक दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता शरद पवारच अजित पवारांसोबत जातील असं वाटू लागलंय, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
बच्चू कडू यांना शरद पवार गटातील काही आमदार हे अजित पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांबाबत विचारण्यात आले होते. त्यावर उत्तर देताना बच्चू कडू यांनी आता शरद पवारच अजित पवारांसोबत जातील असं वाटू लागलंय, असं विधान केलं.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडामुळे शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर वर्षभराच्या आतच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठं बंड होऊन दोन गट निर्माण झाले होते. तसेच यापैकी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह मिळालं होतं. दरम्यान, नंतरच्या काळात झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने दणदणीत विजय मिळवला होता. मात्र काही महिन्यांतच झालेल्या धानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत अजित पवार गटानेही आपली ताकद दाखवून दिली होती.