“गृहखात्याच्या मदतीशिवाय कोरटकर पळू शकत नाही”; राऊतांचा आरोप

0
105

माणदेश एक्सप्रेस/मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी फरार असलेला प्रशांत कोरटकर दुबईला पळाला असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. कोरटकरचे दुबईतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून तातडीने जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिल्यानंतर कोरटकर दुबईला पळाला असल्याचे म्हटलं जात आहे. यावरुन खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. गृहखात्याच्या मदतीशिवाय कोरटकर पळू शकत नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

 

 

“प्रशांत कोरटकर हा नागपूरचा त्यांचाच माणूस आहे. आता तो पळून गेला की नाही हे देवेंद्र फडणवीस सांगतील. उद्या आम्ही म्हणायचो की तो पळून गेला आणि तो भाजपच्या कार्यालयात कुठेतरी सापडायचा किंवा एखाद्या भाजपच्या मंत्र्याच्या बंगल्यात सापडायचा किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा. भाजपच्या राजवटीत काहीही होऊ शकतं. खरोखरच कोरटकर पळून गेला असेल तर गृहखात्याच्या मदतीशिवाय तो हे करू शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस इतके सक्षम आहेत की आरोपींना पकडतात. ज्यांना पकडायचं नाही त्यांना सोडून देतात आणि विरोधक आहेत त्यांना बरोबर पकडतात. कृष्णा आंधळे सापडत नाही, कोरटकर सापडत नाही. त्यामुळे हे संपूर्ण सरकार मनोरुग्ण आहे आणि यांना उपचाराची गरज आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

 

 

“नागपुरच्या दंगलीतील आरोपींना पकडून रोज पोलीस सांगत आहेत याला पकडलं त्याला पकडलं. पण ज्याला पकडायचं होते तो पळून गेला. ज्या दिवशी प्रशांत कोरटकरला जामीन नाकारला तेव्हा तो नागपुरमध्येच होता. जर तो पळून गेला असेल तर नागपुरच्या पोलीस आयुक्तांची ताबडतोब बदली करायला पाहिजे. गृहमंत्र्यांनी यासंदर्भात जबाब दिला पाहिजे,” असंही संजय राऊत म्हणाले.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here