रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार, रोहिणी खडसेंचा संताप…

0
162

माणदेश एक्स्प्रेस/जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शाखेच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आज (१४ मार्च) जळगावात धुलीवंदन सण साजरा केला आणि राज्यातील जनतेला होळी व धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर त्या म्हणाल्या, “राज्य सरकारने राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावं. महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. अलीकडेच एक सर्वेक्षण झालं, ज्या सर्वेक्षणाच्या अहवालात असं म्हटलं आहे की आशिया खंडातील महिलांसाठीच्या सर्वात असुरक्षित देशांपैकी भारत एक आहे. या यादीत भारताची गणना होणं हे भारतासाठी खूपच दुर्दैवी आहे.”

 

 

 

 

 

रोहिणी खडसे म्हणाल्या, “पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती नाही. त्यामुळेच गुन्हेगारी घटना घडत आहेत. राज्यात कायद्याचा वचक असता तर गुन्हेगारी घटना घडल्या नसत्या. महिलांच्या सुरक्षिततेबाबत आपलं सरकार निरुत्साही आहे. महिलांच्या सुरक्षेतेकडे त्यांचं दुर्लक्ष होतंय असं मला वाटतंय. त्यामुळे महिलांच्या संरक्षणासाठी कडक कायदे करणे आवश्यक आहे. मला असं वाटतं की सरकारने लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे.”

 

 

 

 

दरम्यान, यावेळी रोहिणी खडसे यांना त्यांच्या भाचीच्या छेडछाड प्रकरणाच्या तपासाविषयी प्रश्न विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “त्या घटनेला १० दिवस उलटले आहेत. तरीदेखील या प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार आहेत. या आरोपींना नेमकं कोणाचं पाठबळ आहे असा प्रश्न पडला आहे. त्यांच्यामागे नेमका कोण आका आहे ते शोधायला हवं. कोणाचं तरी त्यांना पाठबळ मिळतंय म्हणूनच ते इतके दिवस फरार राहू शकले.”

 

 

 

 

रोहिणी खडसे म्हणाल्या, “एका केंद्रीय मंत्र्याच्या घरातील मुली सुरक्षित नसतील तर महाराष्ट्रातील सामान्य माताभगिनींच्या सुरक्षिततेबद्दल काय बोलणार. इतकी मोठी घटना होऊनही आरोपी अद्याप फरार आहेत. त्यामुळे माझी मागणी आहे की सरकारने कायद्याचा वचक निर्माण करावा. माझी, तुमची किंवा कोणाचीही मुलगी असली तरी तिला संरक्षण मिळायलाच हवं आणि ती सरकारची जबाबदारी आहे.”

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here