विषारी दारू पिल्याने 25 जणांचा मृत्यू, 60 हून अधिक रूग्णालयात दाखल

0
10

तामिळनाडूतील कल्लाकुरिची शहरात मंगळवारी रात्री विषारी दारू प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 60 हून अधिक लोकांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची संख्या आणखी वाढेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. शहराच्या हद्दीतील करुणापुरम येथे मंगळवारी रात्री रोजंदारी कामगारांच्या एका गटाने दारू घेतली होती. कल्लाकुरिचीचे जिल्हाधिकारी एमएस प्रशांत यांनी जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेतली. या प्रकरणानंतर जिल्हाधिकाऱ्यांसह अनेकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या मृत्यूबद्दल शोक आणि दु:ख व्यक्त केलेत, “कल्लाकुरिची येथे मद्य प्राशन करणाऱ्या लोकांच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्का बसला. या गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना अटक करण्यात आली आहे. ते रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. अशा गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्यांबद्दल जनतेने माहिती दिल्यास तात्काळ कारवाई केली जाईल. समाज बिघडवणारे असे गुन्हे थांबवले जातील,” असे एमके स्टॅलिन म्हणाले.

 

तमिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांनीही जीव गमावलेल्या मजूरांबद्दल शोक व्यक्त केला आणि बाधित लोक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली.