
अनेक जण कर्जबाजारी; कुटुंबांची होत आहे वाताहत
माणदेश एक्सप्रेस न्युज
दिघंची (प्रतिनिधी) – मोबाईलमधून सुरू होणाऱ्या करमणुकीचा हा खेळ आता युवकांच्या आयुष्यावरच घाला ठरत आहे. दिघंची गावातील अनेक युवक ऑनलाइन गेम्सच्या आहारी गेल्याचे स्पष्ट होत असून, त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींमुळे कर्जबाजारी होण्याचे प्रकार वाढले आहेत.
सुरुवातीला करमणूक म्हणून सुरू केलेले गेम खेळणं हळूहळू व्यसनात रूपांतरित होत आहे. ‘पब्जी’, ‘फ्री फायर’, ‘रम्मी’, ‘लूडो’ सारख्या गेमच्या नावाखाली सट्टा लावला जात असून, त्यासाठी अनेकजण आर्थिक नुकसान सहन करत आहेत. काही युवकांनी यासाठी कर्ज घेतले असून, परतफेड न झाल्यामुळे घरगुती वाद, नैराश्य आणि आत्महत्येचे विचार डोकं वर काढत आहेत.
गावातील काही पालकांनी सांगितलं की, “आमच्या मुलांनी अभ्यास सोडून दिवसाचे तासन्तास मोबाईलवर गेम खेळण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी ते पैसे मागतात, आणि न दिल्यास घरात वाद निर्माण होतो. काहींनी तर ऑनलाईन गेमसाठी कर्ज काढलं आहे.”
दिघंचीतील एका युवकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, “सुरुवातीला फक्त मजेसाठी खेळत होतो, पण जिंकताना जी पैशाची चव लागली, त्याने व्यसनच जडलं. आता नुकसान भरून काढण्यासाठी पुन्हा खेळतो – आणि अधिकच अडचणीत सापडतो.”
यासंदर्भात स्थानिक शिक्षक आणि समाजसेवकांनी चिंता व्यक्त केली असून, गावात जनजागृती मोहीम राबवण्याची गरज व्यक्त केली आहे. पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे, संवाद साधणे आणि योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे आवाहन करण्यात येत आहे.