
Easy and simple weight loss tips : वाढत्या वजनाची समस्या हल्ली खूप जणांना भेडसावते आहे. योग्य आहार आणि योग्य व्यायाम केला तर वाढतं वजन नक्कीच कमी होऊ शकतं. पण अनेक लोकांकडून या दोन्ही गोष्टी होत नाहीत. त्यामुळे मग वजनाचा काटा पुढेपुढेच सरकत जातो. त्यामुळेच आता जो ट्रेण्ड आला आहे त्यानुसार अनेक जण चहा- कॉफी यामधली साखर कमी करतात. पण आलिया भट, अनन्या पांडे यांच्यासारख्या सेलिब्रिटींना डाएट टिप्स देणारे डॉ. सिद्धांत भार्गव सांगातात की १ टीस्पून साखरेतून तुम्हाला २० ते २५ कॅलरी मिळू शकतात. अशा पद्धतीने दिवसातून दोन वेळा चहा- काॅफी घेतल्यास काही हरकत नाही. कारण Cleveland Clinic यांच्या रिपोर्टनुसार प्रौढ व्यक्तीला एका दिवशी १८०० ते २५०० कॅलरीची गरज असते. त्यामुळे चहा, काॅफीमध्ये साखर घेतल्याने तुमचं वजन खूप वाढणार आहे, असं मुळीच नाही. त्याउलट जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने चुकीचे पदार्थ खाल्ले तर मात्र तुमचं वजन खूप वाढू शकतं. ते नेमकं कसं ते पाहा.
डॉ. भार्गव सांगतात की जेव्हा तुम्ही साखर इतर फॅट्ससोबत खाता तेव्हा ते वजन वाढीसाठी जास्त कारणीभूत ठरतं. उदाहरणार्थ कोणत्याही गोड पदार्थामध्ये भरपूर प्रमाणात तूप, खवा, तेल असतं.
असे गोड पदार्थ जेव्हा तुम्ही खाता तेव्हा तुमच्या पोटात खूप जास्त कॅलरी जातात आणि मग ते वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतं. HealthCentre.nz यांच्या रिपोर्टनुसार तेलातुपामध्ये कॅलरी भरपूर असतात. त्यामुळे जेव्हा गोड पदार्थ तुम्ही खाता तेव्हा गरजेपेक्षा जास्त कॅलरी पोटात जाऊन तुमचं केवळ वजनच वाढत नाही, तर त्यासोबतच इन्सुलिनची पातळी बिघडणे, शरीरात चरबी साठणे असे त्रासही होतात.
त्यामुळे जेव्हा असे गोड पदार्थ खाल तेव्हा ते खूप मर्यादित खा. ते खाताना कॅलरी काऊंट करायला विसरू नका. वारंवार गोड पदार्थ खाणं टाळा. कधीतरीच खायला हरकत नाही. गोड खाण्याची खूपच इच्छा होत असेल तर अगदी प्रमाणात खा. गोड पदार्थ खाणं झाल्यानंतर व्यायाम करायला विसरू नका. जेणेकरून शरीरातल्या अतिरिक्त कॅलरी बर्न होण्यास मदत होईल.