
माणदेश एक्सप्रेस न्युज
रत्नागिरी : हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात १५ ते १८ मे या कालावधीत ‘यलो अलर्ट’ दिला आहे. जिल्ह्यात गडगडाट होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची, वीज चमकण्याची व ताशी ४० ते ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत करण्यात येत आहे.
हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in// या संकेतस्थळावरून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (02352) 222233 / 226248 किंवा पोलिस हेल्पलाइन क्रमांक 112 वर संपर्क करा.
हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.
घ्यावयाची काळजी….
वीज चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्रोतांपासून अलग करून ठेवावीत.
दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा.
वीज चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
विजेच्या खांबांपासून लांब राहावे. उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये.
वीज चमकत असताना मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे.
धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.
वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाइलवर ‘दामिनी ॲप’ डाऊनलोड करून घ्यावे.
पाऊस पडत असताना वीज चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये. पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.
अशाप्रसंगी मोबाइलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर राहावे.