
माणदेश एक्सप्रेस न्यूज |मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळजनक घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
यावरून विरोधकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारवर थेट हल्लाबोल केला.
दमानिया म्हणतात, “वाह फडणवीस वाह! एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जाणार? की आमच्यासारख्या भ्रष्टाचारविरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमचं काहीही वाकडं करू शकत नाही?”; त्यांनी आणखी सवाल उपस्थित केला की, “सभ्य माणसे मिळत नाहीत का राजकारणात?”
त्यांनी यावेळी भुजबळांचा तुरुंगातील काळ आठवून म्हटलं की, “जेव्हा ते जेलमध्ये होते, तेव्हा एक ‘बिचारा’ फोटो दाखवला जात होता… आता ते पुन्हा ठणठणीत! हेच का भ्रष्टाचाराविरोधात उचललेले ‘मोठे पावलं’? किळस वाटतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची.”
मंत्रिपद स्वीकारल्यानंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “१९९१ पासून मी विविध खात्यांचा मंत्री राहिलो आहे. मुख्यमंत्री जे खाते देतील, ते मी सांभाळीन. गृहमंत्रालयासकट अनेक खात्यांचा अनुभव आहे. ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे.”