
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : महात्मा गांधी वसतिगृहाच्या नूतन इमारतीसाठी 36 कोटींचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे प्रलंबित आहे. सदर निधी मंजूर करून घेण्यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असून निधी मिळवण्यासाठी टोकाचा प्रयत्न करू, अशी ठाम ग्वाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.
महात्मा गांधी वसतिगृहाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच आ. गोपीचंद पडळकर यांची भेट घेऊन वसतिगृहाच्या सध्याच्या दयनीय स्थितीची माहिती दिली आणि विविध मागण्या मांडल्या. शिष्टमंडळात महेश खराडे, सागर चव्हाण, सागर जुगदर, प्रतीक पाटील, कबीर मुलाणी, महादेव हिंगमिरे, सचिन गिड्डे, प्रमोद गोसावी, तुषार खराडे, विनायक जाधव, दत्ता कोळेकर आदींचा समावेश होता.
यावेळी महेश खराडे यांनी सांगितले की, “महात्मा गांधी वसतिगृह हे जत, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर आदी दुष्काळी तालुक्यांतील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी वरदान आहे. मात्र, सध्या ही इमारत धोकादायक घोषित झाल्याने वसतिगृह बंद आहे. जानेवारी महिन्यात 36 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, परंतु अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे निधी मिळवण्यासाठी प्रयत्न व्हावेत,” असे आवाहन त्यांनी केले.
शिष्टमंडळाने आ. पडळकर यांना निवेदन सादर करताना वसतिगृहाच्या नूतन इमारतीसाठी तातडीने निधी मंजुरीची गरज व्यक्त केली. यावर प्रतिक्रिया देताना आ. पडळकर म्हणाले, “मी स्वतः या वसतिगृहाचा माजी विद्यार्थी आहे. येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांची परिस्थिती मला ठाऊक आहे. त्यांच्या निवासाच्या अडचणी दूर करण्यासाठी 36 कोटी रुपयांचा निधी तातडीने मिळावा, यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन आणि पाठपुरावा करून हा निधी मिळवून देईन.”
यावेळी नामदेव पाटील, संजय गडदे, संदीप ओलेकर, सागर भोसले, वरदराज चव्हाण, दत्ता कुलाल, विशाल पाटील, अभिजित कदम, शरद माने, रमेश सरगर, अक्षय माने, समाधान गडदे, सहदेव आवळे, सुनील गडदे, सागर बनसोडे, बिरूदेव गडदे, गजानन मुळीक, संजय बालेकाई यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.