आम्हालाही शेतकऱ्यांची चिंता; बच्चू कडूंनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकार मार्ग काढेल – अजित पवार

0
73

माणदेश एक्स्प्रेस न्यूज|पुणे : “शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. बच्चू कडूंनी टोकाचे पाऊल उचलू नये. त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार लवकरच समिती स्थापन करेल,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. पुण्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे आश्वासन दिले.

 

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे अमरावती येथे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या प्रकृतीची प्रकृती खालावली असतानाही सरकारने अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत, असा आरोप करत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील मॉडेल स्कूल व मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र लोकार्पण सोहळ्यात गोंधळ घातला.

 

कार्यक्रम सुरू असताना अचानक प्रहार कार्यकर्ते आक्रमक झाले आणि जोरदार घोषणाबाजी करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला. महिलांसह अनेक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी आंदोलन छेडले. पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र काही वेळ पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.

 

“कालच चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर संवाद साधून दिला आहे. बच्चू कडूंनी अशा पद्धतीचे टोकाचे पाऊल उचलू नये. सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा मार्ग काढेल,” असे अजित पवार म्हणाले. त्यांनी उपस्थितांना संयम बाळगण्याचे आवाहन केले.

 

कार्यक्रमाच्या अखेरीस अजित पवार यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासन देत शांत करण्याचा प्रयत्न केला. आता सरकारकडून या प्रकरणी पुढील पावले कधी उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here