शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्या; नाहीतर खुर्च्या खाली करा – काँग्रेसचा सरकारला इशारा

0
91

माणदेश एक्स्प्रेस न्यूज|मुंबई : शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याची गरज असताना भाजपा युती सरकार जाणूनबुजून वेळकाढूपणा करत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे, शेतमालाला हमीभाव नाही आणि जगाचा पोशिंदा उद्ध्वस्त झाला असताना सरकार कर्जमाफी देत नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

 

“निवडणुकीवेळी कर्जमाफीचे आश्वासन देऊन सत्ता मिळवली आणि आता निर्लज्जपणे आम्ही बोललोच नाही, असे सत्ताधारी म्हणतात. शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणे जर जमत नसेल, तर सत्ताधारींनी खुर्च्या खाली कराव्यात,” असा इशारा सपकाळ यांनी दिला.

 

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी कर्जमाफीबाबत जाब विचारला असता अजित पवारांनी दमदाटी केली, ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असेही सपकाळ म्हणाले. “तुम्ही जनतेचे सेवक आहात, मालक नाही, हे भान सत्ताधाऱ्यांनी ठेवावे. आश्वासन देताना समिती आठवली नाही, आता समिती स्थापन करणार म्हणता. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी पैसे नाहीत, पण अदानी-अंबानींसाठी हजारो कोटी कुठून येतात?” असा सवालही त्यांनी केला.

 

सपकाळ पुढे म्हणाले, “भाजपा युती सरकार अदानी-अंबानींसाठी पायघड्या घालते, पण शेतकरी व भगिनींना पैसे देताना चालढकल करते. सुरजागड, समृद्धी महामार्ग, घोडबंदर बोगदा, पुणे रिंग रोड अशा प्रकल्पांत भ्रष्टाचार करायला पैसे असतात, मग शेतकऱ्यांसाठी का नाही? तिजोरी रिकामी असेल तर दिल्लीला जा, मोदी-शहांकडून निधी आणा,” अशी टोलेबाजी त्यांनी केली.

 

“शेतकरी आणि भगिनींच्या संयमाचा अंत पाहू नका, नाहीतर त्याची किंमत सरकारला चुकवावी लागेल,” असा सज्जड इशारा देत त्यांनी आंदोलनाची चेतावणी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here