उमाजी चव्हाण यांचा रासपला ‘रामराम’

0
532

माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी/प्रतिनिधी : बहुजन समाजात प्रभाव असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाला आटपाडी तालुक्यात मोठा धक्का बसला आहे. राजेवाडी येथील रासप नेते, माजी जिल्हाध्यक्ष, व कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय असलेले उमाजी मोहन चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

 

 

त्यांच्या राजीनाम्यामुळे तालुक्यातील रासप संघटनेत काही काळापासून असलेली नाराजी व अस्वस्थता आता उघड झाली आहे. अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या वरिष्ठ नेत्याचा पक्ष सोडणे ही पक्षासाठी मोठी खंतजनक बाब मानली जात आहे.
उमाजी चव्हाण यांनी २००५ पासून रासपमध्ये सक्रीय कामकाज सुरू केले. त्यांनी राजेवाडी शाखेचे सचिव, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष, विविध निवडणुकांचे प्रभारी अशा अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. २०१४ ते २०२३ या कालावधीत त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पूर्णवेळ काम करत पक्षाला बळकटी दिली.

 

तसेच, पक्षाचे सर्व प्रमुख कार्यक्रम, सभा, मोर्चे आणि संघटनात्मक नियोजन त्यांनी खांद्यावर घेतले होते. त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांचा तालुक्यात विश्वासार्ह व समर्पित कार्यकर्ता म्हणून लौकिक निर्माण झाला होता.
राजीनाम्याबाबत लिहिलेल्या पत्रात उमाजी चव्हाण यांनी स्पष्ट केलं की, “मी पक्षात प्रामाणिकपणे व निष्ठेने काम केलं आहे. पक्षाने दाखवलेला विश्वास आणि दिलेल्या संधींबद्दल मी कृतज्ञ आहे. मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.

 

उमाजी चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले असून रासपमधील अंतर्गत वाद, दुर्लक्षितपणा, कार्यकर्त्यांमधील नाराजी यावर आता नव्याने चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पक्षातील इतर नाराज कार्यकर्त्यांचे मनोबल अधिक ढासळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

सध्या उमाजी चव्हाण कुठल्या पक्षात प्रवेश करणार का, की स्वतंत्र कार्यकर्त्याच्या भूमिकेत काम करत राहणार, याबाबत त्यांनी कोणतीही घोषणा केली नाही. मात्र त्यांच्या अनुभव आणि संघटन क्षमतेचा विचार करता, आगामी काळात विविध पक्षांकडून त्यांच्या संपर्काचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here