
माणदेश एक्स्प्रेस न्यूज|मुंबई – शिवसेना वर्धापन दिन सोहळ्यात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यावर जिव्हारी लागणारी आणि खोचक टीका केली. ‘‘उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा…’’, अशा शब्दांत त्यांनी राणेंचा उल्लेख करत भाजपवर जोरदार निशाणा साधला.
मुंबईत पार पडलेल्या शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. सध्या देशात हिंदू-मुस्लिम तणाव पसरवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला. ‘‘भाजपचा एक बेडूक ओरडतोय, त्याला तेवढंच काम दिलंय. उंची किती, आवाज कसा, चाल कशी? आणि डोळे कोणासारखे आहेत माहीत नाही… कोणावर बोलतोय, पार्श्वभूमी काय? वडिलांची पार्श्वभूमी काय? आणि कोणता तरी एक बाप तरी ठरवा’’, अशा शब्दांत त्यांनी नितेश राणेंवर सडकून टीका केली.
ठाकरे पुढे म्हणाले, ‘‘शिवसेना ५९ वर्षांची झाली. या काळात आमचा नेता एकच आहे, भगवा एकच आहे, आमचं दैवत आणि विचारही एकच आहे. शिवसेनेचा वारसा आणि विचार कधीही ढळू दिला जाणार नाही.’’ या ठिणगीसारख्या टीकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या या टीकेची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.