
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/(प्रतिनिधी) : भारतीय सैन्याने अलीकडेच यशस्वीपणे पार पाडलेल्या “ऑपरेशन सिंदूर” या कारवाईनंतर संपूर्ण देशभरातून भारतीय सेनेच्या कार्याची स्तुती होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आटपाडी तालुक्यातील जनतेच्या वतीने, भारतीय सेनेच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या तिरंगा रॅलीचे नेतृत्व भाजप नेते, माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी केले. सदरची तिरंगा रॅलीची सुरुवात आटपाडी बस स्थानकपासून सुरु झाली. या तिरंगा रॅलीमध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष दादासो हुबाले, युवा नेते विनायककाका पाटील, चंद्रकांत दौंडे, बनपुरीचे महादेव पाटील, नाथा सरगर, जयंवत सरगर, विष्णू अर्जुन, प्रणव गुरव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बसस्थानकपासून तिरंगा रॅलीस सुरुवात झाली. मेन व्यापारी पेठ मार्गे, बाजार पटांगण, दिघंची रोड ते आण्णाभाऊ साठे चौक येथे तिरंगा रॅली समाप्त झाली. रॅलीदरम्यान देशभक्तिपर गीतांची धून, हातात तिरंगा धारण केलेले युवक आणि देशसेनेबद्दलचा अभिमान असलेली जनतेची उपस्थिती या सर्व घटकांनी आटपाडीतील वातावरण देशभक्तीमय झाले होते.