
माणदेश एक्सप्रेस न्युज
पुणे : तिथीप्रमाणे 19 मार्च रोजी धर्मवीर श्री संभाजी महाराज यांचा बलिदान दिन आहे. धर्माभिमानी छत्रपती श्रीसंभाजी महाराजांनी बलिदान केले; पण धर्म सोडला नाही. औरंगजेबासमोर मान झुकवली नाही. पराक्रमी शूर राजा होता. 19 वर्षांत 100 पेक्षा जास्त लढाया जिंकल्या. ज्याने संभाजीराजांचे 40 दिवस अतोनात क्रूरपणे हाल करून मारले अशा औरंगजेबाची निशाणी आपल्याला महाराष्ट्रात कशाला पाहिजे ? या देशद्रोही औरंगजेबाची निशाणी महाराष्ट्रात नकोच, असे परखड मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारजे येथे व्यक्त केले.
वारजे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शिवभक्त प्रतिष्ठानकडून दोन दिवसीय शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. या वेळी आमदार विजय शिवतारे, नाना भानगिरे, अनिकेत जावळकर, विनोद जावळकर, प्रतीक्षा जावळकर, रोहिदास शिंदे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री असताना गडकोट-किल्ल्यांचे रक्षण करण्याचे काम केले आहे. जवळपास बारा किल्ले युनेस्कोमध्ये आले. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या बहिणी, भाऊ आणि शेतकरी यांच्यासाठी योजना सुरू केल्या आहेत. माझ्या लाडक्या बहिणींची योजना ही चालूच राहणार असल्याची ग्वाही देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी दिली.