
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : आयपीएलचा अंतिम सामना आता 3 जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. मंगळवारी (दि. 20) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला. अहमदाबाद मैदानावरच 1 जून रोजी क्वालिफायर 2 चे ही आयोजन करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.
बोर्डाने सांगितले की, क्वालिफायर-1 आणि एलिमिनेटर सामने पंजाबमधील मुल्लानपूर स्टेडियमवर खेळवले जातील. हे दोन्ही सामने 29 आणि 30 मे रोजी होतील. दुसरा क्वालिफायर सामना अहमदाबादमध्ये खेळला जाईल. खरं तर, देशातील अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने प्लेऑफ सामन्यांसाठी ही मैदाने निवडली आहेत. एवढेच नाही तर 23 मे रोजी बेंगळुरूमध्ये होणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना पावसामुळे लखनऊला हलवण्यात आला आहे.
आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये तीन संघांनी आपले स्थान निश्चित केले आहे. हे तीन संघ म्हणजे गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज. आता शेवटच्या स्थानासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये लढत सुरू आहे. आता या दोन्ही संघांपैकी कोणता संघ अंतिम चारमध्ये पोहोचतो हे पाहणे बाकी आहे. आयपीएलच्या चालू हंगामात अजून 9 लीग सामने खेळवले जाणार आहेत. शेवटचा लीग सामना 27 मे रोजी खेळला जाईल आणि त्यानंतर प्लेऑफ सामने सुरू होतील.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर आतापर्यंत दोनदा आयपीएलचा अंतिम सामना खेळवण्यात आला आहे. आयपीएल 2022 चा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात याच मैदानावर खेळवण्यात आला. त्या सामन्यात गुजरातने 7 विकेट्सने विजय मिळवून इतिहास रचला. पुढच्या वर्षी म्हणजेच आयपीएल 2023 चा अंतिम सामनाही नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. त्यावेळी, चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव केला आणि पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकले.
फोटो : आयपीएल ट्रॉफी