छावा चित्रपटातला ‘तो’ वादग्रस्त भाग काढला; मंत्री उदय सामंत म्हणाले…

0
154

छावा चित्रपटातील तो वादग्रस्त भाग काढला; मंत्री उदय सामंत म्हणाले…विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरचं सर्वांनीच भरभरून कौतुक केलं आहे. पण, यामधल्या नृत्यावर राजकीय क्षेत्रातील काही मान्यवरांनी नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय चित्रपटातले काही संवाद देखील नेटकऱ्यांना खटकले आहेत. सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर करून चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न असल्याची टीका करण्यात आली. त्यावर राज्य सरकारनेही आक्षेप घेतला होता. आता या चित्रपटातील हा वादग्रस्त भाग काढून टाकण्यात आला आहे.

 

चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळत नृत्य करताना दिसत असल्याबद्दल आक्षेप घेतला जात आहे. काही संघटनांनी याविरोधात आंदोलनही सुरू केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्मात्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. यावर राज्य सरकारचे मंत्री आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते उदय सामंत यांनी भूमिका मांडली होती. ते म्हणाले होते, “धर्मरक्षक, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे ही आनंदाची गोष्ट आहे, छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहेत. मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत अनेकांनी मते व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी आमची भूमिका आहे.”

 

छावा चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई एकत्र नृत्य करताना दाखवले आहे. यावर माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनीही काहीशी नाराजी व्यक्त केली. मात्र त्याचवेळी त्यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे कौतुकही केले. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर एवढे मोठे बजेट असेलला चित्रपट काढला, त्याबद्दल त्यांचे कौतुक करतो, असेही ते म्हणाले आहेत.

 

“छावा या नावाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट येत आहे. ही आनंदाची बातमी आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास यातून पुढे येईल. चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची टीम मला येऊन भेटली होती. त्यांनी ट्रेलरची क्लिप मला दाखवली. पण मी त्यांना संपूर्ण चित्रपट दाखविण्याची मागणी केली होती. तसेच मी त्यांना काही इतिहासकार जोडून देणार होतो, जेणेकरून चित्रपटात एखादी चूक असेल तर ती दुरूस्त करता येईल. पण त्यांनी इतिहासकारांशी भेटण्यात स्वारस्य दाखवले नाही”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.