
माणदेश एक्सप्रेस न्यूज|अहमदाबाद – देशाला हादरवणाऱ्या एअर इंडिया ड्रीमलाइनर विमान दुर्घटनेनंतर चौकशीला वेग आला असून, अपघाताचे कारण लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. AI-171 या फ्लाइटचा ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर ढिगाऱ्याखालून शोधून काढण्यात आले आहेत. या दोन्ही उपकरणांमधून अपघाताच्या क्षणी विमानात काय घडले याचा तपशील मिळणार आहे.
या भीषण अपघातात एकूण २९७ जणांचा मृत्यू झाला आहे. विमानातील २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला असून, केवळ एक प्रवासी – रमेश विश्वास – चमत्कारिकरीत्या बचावला आहे. मृतांमध्ये २२९ प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. विमान ज्या मेडिकल कॉलेज हॉस्टेलवर कोसळले, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ५६ जणांनाही आपला जीव गमवावा लागला.
विमान टेकऑफ केल्यानंतर काही सेकंदांतच कोसळल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विमानात नेमका कसा तांत्रिक बिघाड झाला? पायलटने मेडे कॉल दिल्यानंतर प्रतिसाद का थांबला? आणि शेवटच्या क्षणी विमानात काय घडले? याविषयी सखोल तपास सुरू आहे. आता सापडलेले ब्लॅक बॉक्स व व्हॉईस रेकॉर्डर तपासल्यानंतर या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.
या दुर्घटनेनंतर केंद्र सरकारने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अपघातस्थळी भेट दिली आणि अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी प्रवाशांची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आणि राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद विमानतळावर अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत दुर्घटनेबाबतचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. तांत्रिक बाबी, सुरक्षा त्रुटी, व अपघातानंतरची मदतकार्ये यांचा सविस्तर आढावा घेतला गेला.