अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात : वाजे कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ

0
169

कवठे येमाई (ता. शिरूर) :
अष्टविनायक महामार्गावर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून, या दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वडनेर गावचे वाजे कुटुंब या अपघातात उद्ध्वस्त झाले.

मृतांमध्ये आई, मुलगा व पुत्राचा समावेश

या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये ज्ञानेश्वर मकाजी वाजे (३८), त्यांची मातोश्री शांताबाई मकाजी वाजे (६८) आणि मुलगा युवांश (५) यांचा समावेश आहे. अपघातात टँकर चालक गंभीर जखमी असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची थरारक घटना

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर वाजे हे मुंबईहून दूध वाहतूक करणाऱ्या टँकरमधून (एमएच १६ सीडी ९८१९) आपल्या आई व लहान मुलासह गावी परतत होते. पहाटेच्या सुमारास अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई येथे बंटी हॉटेलजवळ टँकरने समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकला (एमएच ४२ बी ८८६६) जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की टँकर थेट ट्रकमध्ये घुसला.

अपघाताचा आवाज इतका प्रचंड होता की, परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी तातडीने जखमींना वाहनातून बाहेर काढले. मात्र, लहानगा युवांश याचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेल्या शांताबाई आणि ज्ञानेश्वर यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.

पोलिसांचा पंचनामा व तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच टाकळी हाजी पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, चालकाचे नियंत्रण सुटणे अथवा झोपेच्या झटक्यामुळे अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गावात शोककळा

या अपघातात वडनेर गावातील एक कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. दिवसभर या घटनेची चर्चा होती. मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अंत्यसंस्कारासाठी गावात शेकडो नागरिक उपस्थित राहणार असल्याचे समजते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here