
माणदेश एक्सप्रेस न्यूज
मुंबई : पाकिस्तान व पीओकेमधील दहशतवाद्यांवर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे कडक कारवाई केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा एकदा ताणले गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर आशिया कप 2025 स्पर्धेत भारत सहभागी होणार की नाही, यावर मोठं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये भारत या स्पर्धेतून माघार घेणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र बीसीसीआयने आता या चर्चांवर पूर्णविराम दिला आहे.
बीसीसीआय सचिव दैवजित सैकीया यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं की, “बीसीसीआयने अद्याप आशिया कप 2025 किंवा एमर्जिंग आशिया कपबाबत कोणतीही चर्चा एसीसीसोबत केलेली नाही. तसेच स्पर्धेतून माघार घेण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही.”सैकीया पुढे म्हणाले, “आज सकाळपासून बीसीसीआयने स्पर्धेतून माघार घेतल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र त्यात काहीही तथ्य नाही.
सध्या आमचं संपूर्ण लक्ष आयपीएल 2025 आणि त्यानंतर होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यावर केंद्रित आहे.”दरम्यान, आशिया कप 2025 ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात होणार असून यावेळी भारताकडे यजमानपद आहे. मागीलवेळी पाकिस्तान यजमान देश होता, मात्र भारताने आपले सामने श्रीलंकेत खेळले होते. त्या स्पर्धेत टीम इंडियाने विजेतेपद मिळवले होते.आशिया कप 2025 बाबत बीसीसीआयने कोणताही निर्णय घेतलेला नाही.पाकिस्तानबरोबर तणाव असला तरी क्रिकेट स्पर्धेतील सहभागावर कोणतीही अधिकृत माघार नाही.बीसीसीआयचं लक्ष सध्या आयपीएल आणि इंग्लंड दौऱ्यावर.स्पर्धेबाबत अंतिम निर्णय झाल्यास माध्यमांतून अधिकृत माहिती दिली जाईल.