
माणदेश एक्स्प्रेस न्यूज|अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य कार्यक्रमात राज्य सरकार त्यांच्या जीवनावर चित्रपट तयार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या ऐतिहासिक घोषणेमुळे अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव अधिक व्यापक पातळीवर पोहोचणार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाला, त्याच धर्तीवर अहिल्यादेवींच्या लोककल्याणकारी राजवटीचा प्रेरणादायी इतिहास सिनेमाच्या माध्यमातून सादर केला जाणार आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
फडणवीस म्हणाले, “अहिल्यादेवी होळकर यांनी २८ वर्षे प्रजेसाठी समर्पित राजकारभार केला. त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या काळात हुंडाप्रथा थांबवण्यात आली. त्यांनी बलशाली तोफखाना उभारून आपल्या राज्याचे संरक्षण केले. सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण करून धार्मिक सन्मान उंचावला. त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे, म्हणूनच त्यांच्या जीवनावर चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.”
या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “छत्रपती शिवरायांनंतर जनकल्याणकारी राज्य राबवणाऱ्या नेत्या म्हणून अहिल्यादेवींचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. त्यांच्या राजधानीच्या कर्मभूमीवर आजचा कार्यक्रम झाला, पुढच्या वेळेस त्यांच्या जन्मस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की येतील.” या घोषणेमुळे चौंडी परिसरात उत्साहाचं वातावरण असून, अहिल्यादेवींचा इतिहास अधिक दृश्यमाध्यमातून समोर येणार असल्याने जनतेत समाधान व्यक्त होत आहे.