
माणदेश एक्सप्रेस न्यूज| पुणे : संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पालखी पुण्यात मुक्कामी असताना, कॅम्प परिसरात एका महिलेने वारकऱ्यांच्या अंगावर मांसाचा तुकडा फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे वारकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, पुणे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
सदर प्रकार घडल्यानंतर लगेचच लष्कर पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, ती महिला सध्या आजारी असून रुग्णालयात उपचार घेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने तिच्या पाळीव मांजरीसाठी मांसाचा तुकडा फेकला होता. मात्र तो तुकडा चुकून पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या काही वारकऱ्यांच्या अंगावर पडला. यावरून गैरसमज निर्माण झाला आणि परिस्थिती अधिक चिघळली. महिलेच्या म्हणण्यानुसार, यामागे कोणताही अपमान करण्याचा हेतू नव्हता.
ही घटना घडल्यानंतर पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “ही अपमानास्पद गोष्ट असून वारकऱ्यांच्या श्रद्धेवर घाला घालणारी आहे. पोलिसांनी कठोर कारवाई करावी,” अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे.
पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. परिस्थितीचा सखोल तपास सुरू असून, या प्रकरणात पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.