
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापान कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात झालेला संवाद सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. “आता मला काय विचारताय तुम्ही?” असा संतप्त सवाल एकनाथ शिंदेंनी बावनकुळे यांना केला असून, त्यांचा राग व्यक्त होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
या चहापान कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अनेक मंत्री व सत्ताधारी आमदार उपस्थित होते. यावेळी माध्यमांच्या कॅमेऱ्यात शिंदे-बावनकुळे यांच्यातील संवाद टिपला गेला. त्यात एकनाथ शिंदे visibly नाराज दिसत असून, त्यांनी बावनकुळेंना थेट प्रश्न विचारल्याचे चित्र समोर आले आहे.
याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली, तरी हा संवाद हिंदी सक्तीच्या वादावरून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, गेल्या काही दिवसांपासून राज्यात ‘पहिली ते पाचवीत तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्ती’च्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला होता. मराठी भाषेवरील प्रेम आणि अस्मितेच्या मुद्द्यावरून सरकारला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला.
या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषा धोरणाचा जीआर रद्द करण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात नव्याने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शालेय शिक्षण विभाग हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असल्यामुळे या वादात त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रीत झालं. दुसरीकडे, अजित पवारांनी सरकारमध्ये राहूनही या निर्णयावर खुलेपणाने विरोध केला. त्यामुळे शिंदे गटावर दबाव वाढल्याचं चित्र आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना असल्याचा दावा करणाऱ्या शिंदे गटाला या विषयावर ठोस भूमिका घेता आली नाही, अशी टीका होत आहे.
एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातील हा संवाद आणि त्यातील रोष सत्ताधारी आघाडीत आंतरविरोध किंवा वाढता तणाव अधोरेखित करत असल्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर, सार्वजनिक मंचावर असा संताप व्यक्त होणं ही सत्तेत अंतर्गत घुसमट असल्याचं संकेत मानलं जात आहे.
View this post on Instagram