
माणदेश एक्सप्रेस न्यूज | सोलापूर
शिवसेना शिंदे गटाला सोलापूर जिल्ह्यात पहिला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा संपर्क प्रमुख आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, थेट ‘जय महाराष्ट्र’ म्हणत पक्षाला रामराम ठोकला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना शिंदे सेनेसाठी अडचणीत ठरू शकते.
तीन वर्षांच्या निष्ठेनंतर निराशा
गेल्या तीन वर्षांपासून शिवाजीराव सावंत हे सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख म्हणून सक्रिय होते. जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीपासून ते नवीन कार्यकर्त्यांना जोडण्यापर्यंत त्यांनी सक्रीय भूमिका बजावली. मात्र पक्षातील अंतर्गत गटबाजी, निर्णयप्रक्रियेत दुर्लक्ष आणि विश्वासात न घेणे या कारणांनी त्यांनी अखेर राजीनामा दिला.
राजीनाम्याच्या पत्रात व्यक्त केली नाराजी
शिवाजीराव सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या राजीनाम्याच्या पत्रात स्पष्टपणे आपली खंत व्यक्त केली आहे. “पक्षातील काही व्यक्तींनी सातत्याने अडथळे निर्माण केले, अनेकदा तक्रार करूनही कोणी ऐकले नाही, त्यामुळे मनाला लागले आणि निर्णय घ्यावा लागला,” असे त्यांनी नमूद केले आहे.
समर्थकही नाराज, गट सोडण्याची शक्यता
सावंत यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे अनेक स्थानिक समर्थकही नाराज झाले असून काहींनी त्यांच्याबरोबरच राजीनामा दिला आहे. यामुळे शिंदे गटाची जिल्ह्यातील संघटनात्मक घडी विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुढील वाटचालीकडे जिल्ह्याचे लक्ष
शिवाजीराव सावंत यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे आता संपूर्ण सोलापूरचे लक्ष लागले आहे. ते कोणता पक्ष स्वीकारतात की स्वतंत्र राजकीय प्रवास सुरू करतात, यावर आगामी राजकारणाचे गणित ठरणार आहे. गेल्यावर्षी त्यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना एकत्र करून शक्तिप्रदर्शन केले होते. तानाजी सावंत यांना मंत्रीपद न मिळाल्याची नाराजीही अनेक कार्यकर्त्यांमध्ये होती. अशा पार्श्वभूमीवर सावंत यांचा राजीनामा म्हणजे शिंदे सेनेसाठी गंभीर इशारा मानला जातो आहे.