नारळी पौर्णिमेत वरळीत शिंदे-आदित्य ठाकरे आमनेसामने; गर्दीतून पेटली घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?

0
56

माणदेश एक्सप्रेस न्यूज |मुंबई :-
मुंबईतील वरळी मतदारसंघातील कोळीवाडा शुक्रवारी (दि. ८) नारळी पौर्णिमेच्या पारंपरिक उत्सवाने रंगला होता. समुद्र देवतेला नारळ अर्पण करण्यासाठी कोळी बांधव, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र या सांस्कृतिक जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले. कारण, याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आमनेसामने आले.

अचानक झालेली आमनेसामने भेट

शिंदे कोळी बांधवांसोबत बत्तेरी जेट्टी येथे नारळ अर्पण करून परतीच्या मार्गाला निघाले होते. गर्दी एवढी प्रचंड होती की त्यांच्या पुढे जाण्याचा मार्गच अडला. त्याचवेळी आदित्य ठाकरे समुद्राच्या दिशेने निघाले होते आणि दोघांची भेट झाली. काही फुटांचेच अंतर असतानाही दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे पाहणे टाळले. यावेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. काहींनी ‘जय महाराष्ट्र’, तर काहींनी ‘एकनाथ शिंदे जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या.

पोलिसांचा तत्पर हस्तक्षेप

गर्दीमुळे वातावरण क्षणात तणावपूर्ण झाले. परिस्थिती चिघळण्याची शक्यता पाहून पोलिसांनी त्वरेने हस्तक्षेप करत शिंदे यांना मार्ग मोकळा करून दिला. तसेच दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना वेगळे करून जमाव पांगवण्याचे काम केले.

आदित्य ठाकरे यांचा अप्रत्यक्ष टोला

कार्यक्रमात भाषण करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “वरळी कोळीवाड्यात जगभरातून पर्यटक येतात. या सगळ्यात काही लोकांना महत्त्व द्यायचे नसते,” असा स्पष्ट टोलाही त्यांनी लगावला. तसेच, राहुल गांधी यांच्या निवासस्थानी मागच्या रांगेत बसण्यावरून होणाऱ्या टीकेबाबत बोलताना ते म्हणाले, “कौटुंबिक वातावरण असताना कुठे बसायचे हा आमचा निर्णय असतो. आम्ही कुठे बसलो यापेक्षा राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेले उघड वक्तव्य भाजपला झोंबले आहे. काहींना धक्काबुक्की करून पुढे बसायची सवय आहे,” असा नाव न घेता शिंदेंवर वार केला.

शिंदे यांचे प्रत्युत्तर व विकासाचे आश्वासन

शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “मुख्यमंत्री असताना भूमिपुत्रांना न्याय दिला आहे. कोळीवाड्यातील बहिणी-भावांच्या निमंत्रणाला मान देऊन आलो. कोळीवाड्याचा सर्वांगीण विकास हा राज्य सरकारचा उद्देश आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी कोळी बांधव जसा निर्णय घेतील, त्याप्रमाणे त्यांचा विकास करू. जसे लोकसभा व विधानसभेत महायुतीचे सरकार आले, तसेच महापालिकेतही आमचाच विजय होईल,” असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

सांस्कृतिक जल्लोषात राजकीय टक्कर

नारळी पौर्णिमेचा उत्सव हा कोळी बांधवांचा सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळा असला तरी यंदा या कार्यक्रमात राजकीय चकमक ठळकपणे दिसून आली. दोन्ही सेनेतील कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आपल्या नेत्याला पाठिंबा दिला. पोलिसांनी मात्र परिस्थिती बिघडू न देता दोन्ही बाजूंना संयम पाळण्यास भाग पाडले.

संपूर्ण घटना काही मिनिटांची असली तरी, या आमनेसामने भेटीने वरळीच्या राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ माजवली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घटनेचे राजकीय अर्थ लावण्यास सुरुवात झाली असून, कोळीवाड्याच्या उत्सवात राजकारणाचा तडका बसल्याचे चित्र स्पष्ट दिसले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here