
माणदेश एक्सप्रेस/ आटपाडी : आटपाडी शहरातील नगरपंचायत हद्दीमध्ये अडीच एकर क्षेत्रामध्ये बटरफ्लाय गार्डन उभारले जाणार असून त्याचा शुभारंभ नगरपंचायतचे मुख्याधिकारी वैभव हजारे, अमरसिंह देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी दिग्विजय देशमुख, भगवान मोरे, बळवंत मोरे, बाळासाहेब पाटील, भाऊसाहेब गायकवाड, ऋषिकेश देशमुख, दादासाहेब पाटील, अमोल काटकर उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या भांडवली २०२२-२०२३ मधील भांडवली गुंतवणुकीतून राज्य शासनाला आलेल्या विशेष सहाय योजनेंतर्गत सुमारे चार कोटींचा निधी नगरपंचायतला प्राप्त झाला आहे. यातून बटरफ्लाय गार्डनमध्ये रस्ते, प्रवेश प्लाझा, सुरक्षा दालन, नागरिकांना बसण्यासाठी सुविधा, ॲम्पीथिएटर, वॉकिंग ट्रॅक, फुलपाखरे बघण्यासाठी विशेष बैठक व्यवस्था, संरक्षक भिंत याचबरोबर अन्य सुविधांसाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
आटपाडी शहरामध्ये एकाच ठिकाणी सुमारे पन्नास एकरहून अधिक क्षेत्र बिगरशेती करण्यात आले आहे. यातील नगरपंचायतसाठी वर्ग करण्यात आलेल्या अडीच एकर जागेवर थेट केंद्राचा चार कोटी आठ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.
बटरफ्लाय गार्डन झाल्यानंतर शहराच्या वैभवात भर पडणार आहेच. शिवाय नागरिकांना एक विरंगुळा केंद्र, शिवाय विविध फुलपाखरे, फुलांची झाडे, वृक्ष पहायला मिळणार आहेत. नगरपंचायत हद्दीतील नगरपंचायतच्या जागेवर केंद्र शासनाचा थेट प्रथमच निधी प्राप्त झाला आहे. अद्ययावत असे बटरफ्लाय गार्डन करण्यात येणार आहे. उत्कृष्ट असे गार्डन लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे.