
माणदेश एक्स्प्रेस न्यूज|अथणी : कागवाड-विजापूर राज्य मार्गावर मुरगुंडी येथील बनजवाड पीयू कॉलेजजवळ झालेल्या दोन भीषण अपघातांत तिघेजण जागीच ठार झाले. जोरदार पावसात चिरा भरलेला ट्रक आणि उसाची रोपे भरलेली पिकअप जीप यांच्यातील धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला, तर मदतीसाठी उतरलेल्या युवकाला भरधाव मोटारीची धडक बसून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये शुभम युवराज चव्हाण (२४, रा. कुटवाड, ता. शिरोळ), महेश सुभाष गाताडे (३०, रा. गणेशवाडी, ता. शिरोळ) आणि सचिन विलास माळी (४२, रा. कवलापूर, ता. मिरज) यांचा समावेश आहे.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीहून चिरा भरून निघालेला ट्रक (केए २८ एए ५३८१) विजापूरकडे जात असताना, समोरून येणाऱ्या उसाची रोपे भरलेल्या पिकअप जीपला (एमएच १० सीआर ९८७७) जोरदार धडक दिली. मुसळधार पावसामुळे समोरील वाहन दिसत नसल्याने हा अपघात झाला. धडकेनंतर दोन्ही वाहने उलटली आणि पिकअपमधील शुभम चव्हाण व महेश गाताडे जागीच ठार झाले.
दरम्यान, मिरज येथील कवलापूरचे सचिन माळी हे नातेवाईकांसह अंत्यसंस्कारासाठी जात असताना अपघातस्थळी थांबले. ते मदतीसाठी खाली उतरले असता कागवाडकडे जाणाऱ्या भरधाव मोटारीने (केए २२ एमसी ९२५१) त्यांना धडक दिली. या धडकेनंतर मोटार त्यांच्या अंगावरून गेली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात पाहून गडबडीत उतरलेल्या त्यांच्या नातेवाईकांना किरकोळ दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच उपनिरीक्षक मल्लिकार्जुन उपार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. जोरदार पावसामुळे पंचनाम्यात अडचणी आल्या. रस्ता काही काळासाठी बंद झाला होता. मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असून उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाती मृत्यूमुळे कवलापूरसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सचिन माळी यांच्या अपघाती निधनाने गावात शोककळा पसरली आहे.