
माणदेश एक्सप्रेस न्यूज|विटा : सेल्फीचा मोह जीवावर बेतल्याची एक दुर्दैवी घटना रविवारी (दि. १ जून) सांगली जिल्ह्यातील हिंगणगादे येथे घडली. पाय धुतल्यानंतर सेल्फी काढत असताना पाय घसरून तलावात पडल्याने नणंद-भावजय असलेल्या दोन तरुणींचा मृत्यू झाला.
मृतांची नावे निशा दिगंबर आढगळे (वय २०) व मयुरी हणमंत आढगळे (वय १७) अशी आहेत. दोघीही मूळच्या किर्लोस्करवाडी (ता. पलूस) येथील असून सध्या घानवड (ता. खानापूर) येथे वास्तव्यास होत्या.
किरलोस्करवाडी येथील आढगळे कुटुंबीय सध्या घानवड येथील पोल्ट्री फार्मवर काम करतात. रविवारी सकाळी निशा ही इचलकरंजी येथून घानवड येथे आली होती. दुपारी ती आणि मयुरी प्रातर्विधीसाठी हिंगणगादे येथील तलावाजवळ गेल्या. पाय धुतल्यानंतर त्यांनी मोबाईलवर सेल्फी घेण्यास सुरुवात केली.
यावेळी अचानक पाय घसरल्याने दोघीही खोल पाण्यात पडल्या. पोहता न आल्याने त्या बुडाल्या आणि काही क्षणातच त्यांच्या हालचाली थांबल्या. स्थानिकांनी आणि नातेवाइकांनी तत्काळ त्यांना पाण्यातून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं, परंतु डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. या घटनेची नोंद विटा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन या पुढील तपास करत आहेत.