
माणदेश एक्सप्रेस न्यूज |नागपूर : शेतकरी प्रश्नांवरून आमदार बच्चू कडू यांनी उभारलेल्या आंदोलनाला आता विरोधी पक्षांचेही जोरदार समर्थन मिळू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत बोलताना सरकारला इशारा दिला की, “जर बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नाही, तर हे सरकारला महागात पडू शकते.”
रोहित पवार म्हणाले, “सरकारकडून सातबारा कोरा करण्याचे आश्वासन निवडणुकीपूर्वी देण्यात आले होते. मात्र आजही शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. ८० हजार कोटींचे रस्ते, मंत्र्यांचे विदेश दौरे, आयपॅड खरेदी यासाठी पैसा आहे, पण शेतकऱ्यांसाठी नाही. ही दुजाभावाची भूमिका आहे.”
“मी स्वत: बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. काल शरद पवार साहेबांनीही त्यांच्याशी संपर्क साधला. हे फक्त एकट्या कडू यांचं आंदोलन नाही, तर शेतकऱ्यांच्या भावनांचं प्रतिनिधित्व करणारा आवाज आहे,” असंही पवार यांनी स्पष्ट केलं.
रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका करताना म्हटलं, “कंत्राटदारांना हजारो कोटी दिले जातात, पण भावांतर योजना आणली जात नाही. शेतकऱ्यांचे ४ हजार कोटींचं नुकसान झाले आहे. सरकारने यावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही.”
त्यांनी भाजप नेते संजय शिरसाट यांच्यावरही टीका करत सांगितले, “शिरसाट लाडक्या बहिणी योजनेचे नाव घेतात, पण योजनांचा पैसा गरीबांपर्यंत न पोहोचता कंत्राटदारांच्या खिशात जातो. नियोजनाच्या अभावामुळे राज्य अडचणीत आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याच्या चर्चा फक्त चर्चाच राहतील, असा इशाराही रोहित पवारांनी दिला. “शरद पवार यांच्यासोबत आम्ही ठामपणे आहोत. विचार तोच आहे, फक्त स्टाईल बदलावी लागेल,” असे ते म्हणाले. त्यांनी हेही स्पष्ट केले की, “जयंत पाटील यांच्या सारख्या नेत्यांचा अनुभव आणि युवांनी दिलेली ऊर्जा, हे दोन्ही पक्षाच्या भवितव्यासाठी गरजेचे आहेत.”
रोहित पवार यांच्या या परखड भूमिकेमुळे शेतकरी प्रश्नांवर राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. बच्चू कडूंच्या आंदोलनास मिळालेला विरोधी पक्षांचा पाठिंबा हे सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकते. यापुढे हे आंदोलन किती व्यापक होतं आणि सरकार त्याची काय दखल घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.