
माणदेश एक्सप्रेस न्यूज|पुणे : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना कृषीमंत्री ॲड. माणिक कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. “सरकारने काय मातीचे आणि मोकळ्या वावराचे पंचनामे करायचे का?” असा सवाल करत त्यांनी अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांच्या दु:खाची थट्टा केल्याचा काँग्रेसने आरोप केला आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेत काँग्रेसने कोकाटे यांचा तातडीने राजीनामा घेण्याची मागणी केली.
प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार म्हणाले, “राज्यात अनेक भागांत वळवाच्या पावसामुळे उभ्या पिकांचे, तसेच काढून ठेवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा वेळी कृषीमंत्र्यांनी संवेदनशीलता दाखवून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यंत्रणांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यायला हवेत. पण कोकाटेंनी केलेले विधान शेतकऱ्यांचा अपमान करणारे आहे.”
पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, “कोकाटे हे भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पूर्वीच न्यायालयीन शिक्षेला सामोरे गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या वेदनांची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोकाटेंचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि महसूल विभागाला पंचनामे सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश द्यावेत.”
दरम्यान, कोकाटे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, “शेतात उभ्या असलेल्या किंवा नुकतेच काढलेले पीक पंचनाम्यासाठी ग्राह्य धरले जाईल, पण घरात ठेवलेल्या मालाचे पंचनामे शक्य नाहीत.” मात्र त्यांच्या या भूमिकेवर अनेक शेतकरी संघटनांनीही नाराजी व्यक्त केली आहे.