
माणदेश एक्सप्रेस/मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उफाळून आला आहे. राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना पहिलीपासून हिंदी भाषेव्यतिरिक्त अन्य भारतीय भाषांचेही पर्याय उपलब्ध करून देण्याची शिफारस अभ्यासक्रम आराखडा सुकाणू समितीने केली होती. मात्र ही शिफारस डावलून शिक्षण विभागाने हिंदीची सक्ती केल्याचं म्हटलं जातंय. यावरून सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले आहेत. मनसेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आता यावरून राज ठाकरे यांनीही रोखठोक भूमिका मांडली.
राज ठाकरे म्हणाले, “आपल्याकडे शासनकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला सारून मराठीकडे पाहणं गरजेचं आहे. नुसता भाषा दिवस साजरा करणं किंवा अभिजात भाषेचा दर्जा मिळणं याने मराठी राहणार नाही. मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती होणार असेल तर अशी प्रगती नको आम्हाला. आज जे काही फ्लायओव्हर होत आहेत, हे दिसायला छान दिसतंय, पण यातून मराठी माणसाचं अस्तित्व संपत असेल तर आम्हाला असा विकास नको.”
ते पुढे म्हणाले, “आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज शिकवले जात नाहीत. आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी या शाळा आल्या. या शाळा देशभर सुरू झाल्या. यामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवता येत नाहीत. क्रांतीचा उगम म्हणतो आपण, त्यांचा इतिहास सांगता येत नाही. फ्रेंच रिव्हॉल्युशन शिकवता तुम्ही. ते काय करायचं आहे? आपण इतिहासातून काय बोध घेतोय, ते शिकवणं जास्त गरजेचं आहे.”