
माणदेश एक्सप्रेस न्यूज | १ ऑगस्ट २०२५
राज्यात मॉन्सूनने वेळेआधीच दमदार हजेरी लावली असली तरी जुलैच्या अखेरीस पावसाने उसंत घेतली. यामुळे अनेक भागांतील शेतकरी चिंतेत असतानाच, हवामान विभागाने विदर्भात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
ऑगस्टमध्ये काय म्हणतो हवामान अंदाज?
हवामान खात्याच्या प्राथमिक अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरी पावसाची नोंद होईल. काही भागांमध्ये पावसाच्या सरी कमी अधिक प्रमाणात असू शकतात. कोकणातील काही भागात पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणीच हलक्या सरी कोसळतील.
भंडाऱ्यात पावसाने हजेरी; शेतकऱ्यांचे नुकसान
भंडारा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. मात्र, एका ठिकाणी बांध फुटल्याने शेती पाण्याखाली गेली असून, पिंके (पिकांचे) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे.
पुणे-कोकणात धरणक्षेत्रात पावसाचा जोर
पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोकण आणि घाटमाथा परिसरात चांगला पाऊस सुरू असून, यामुळे उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार पावसाची नोंद झाली आहे. उजनी धरणातून ७१,००० क्यूसेक तर वीर धरणातून ३१,००० क्यूसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे.
काही भागांत अजूनही पावसाची प्रतीक्षा
राज्यातील काही भागांत अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. हवामान तज्ज्ञांच्या मते, ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात आणि सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उशिरा का होईना, पण राज्यात समाधानकारक पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.