
माणदेश एक्सप्रेस न्यूज|शिराळा– एकीकडे मुसळधार पावसाने काही जिल्ह्यांमध्ये हजेरी लावली असताना, दुसरीकडे कृष्णा व भीमा नदी खोऱ्यातील ५२ स्वयंचलित पर्जन्यमापन यंत्रे बंद पडल्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. ११ जूनपासून ही यंत्रणा कोलमडल्याने पावसाच्या प्रमाणाची अचूक नोंद, धरणांतील पाणीसाठा व नदीपातळीचा डेटा मिळणे बंद झाले आहे.
निविदा रखडली, यंत्रणा ठप्प
या यंत्रणेसाठीचा पाच वर्षांचा करार ११ जून २०२४ रोजी संपला असून, नवीन करार प्रस्ताव मंत्रालयाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक यंत्रे बंद आहेत. सांगली, सातारा, पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
आपत्ती व्यवस्थापन अडचणीत
पावसाळ्यात धरण व्यवस्थापन, पुराचा अंदाज आणि पाणी सोडण्याच्या नियोजनासाठी ही माहिती अत्यावश्यक असते. पूर्वी या नोंदी हाताने घेतल्या जात होत्या. मात्र, अचूकता वाढवण्यासाठी जलसंपदा विभागाने उपग्रहाद्वारे २४ तास माहिती संकलित करणाऱ्या स्वयंचलित यंत्रणा बसवल्या आहेत. मात्र करार नूतनीकरणाच्या प्रक्रियेत विलंब झाल्यामुळे ही आधुनिक प्रणालीच ठप्प झाली आहे.
कृष्णा व भीमा खोऱ्यातील सद्यस्थिती
- कृष्णा खोऱ्यात एकूण ५९ यंत्रांपैकी २३ यंत्रे बंद
- भीमा खोऱ्यात ७५ यंत्रांपैकी २९ यंत्रे बंद
- चांदोली परिसरातील पाथरपुंज केंद्र – उच्च पावसाचा विक्रम करणारे महत्त्वाचे केंद्रही बंद
लवकरच यंत्रणा सुरू होईल – जलसंपदा विभाग
“११ जून रोजी जुन्या कराराची मुदत संपली आहे. करार मुदतवाढीसाठी आणि नवीन टेंडरसाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवले आहेत. मंजुरी मिळताच यंत्रणा कार्यान्वित केली जाईल,” अशी माहिती कार्यकारी अभियंता मयुरा जोशी (जलविज्ञान विभाग, सांगली) यांनी दिली.